श्रीरामपूर- गोवंशीय जनावरांची वाहतुक केल्याच्या संशयातून श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गोरक्षकांकडून एका शेतकऱ्यास बेदम मारहाण झाली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. उक्कलगाव येथील धनवाट रोडवरील शेतकरी तरूणाने गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयातून जमलेल्या २५ ते ३० जणांच्या जमावाने काल त्यास बेदम मारहाण केली. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उक्कलगाव येथील सोसायटी शॉपिंग सेंटरसमोर काही तरूण जमा झाले होते. ते कुणाची तरी वाट पाहात असावेत असे वाटत होते. ज्या तरुणाची हे वाट पाहत होते तो तरुणही गावातीलच होता. त्या टोळक्याने त्यास गावात बोलावून घेतले व त्यास लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
२० ते २५ जणांनी त्या युवकास बेदम मारहाण केली. त्यामुळे काहीकाळ गावात तणावाचे निर्माण झाले. त्यावेळी गावात मोठी गर्दी जमलेली होती. मात्र, ही बातमी वाऱ्यासारखी गावात परसल्याने रविवारी सकाळी गावात मोठा जमाव जमा झाला. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध सुरु होता. रात्रीच्या घडलेल्या खळबळजनक प्रकारानंतर गावातील मारहाण करणारे तरुण पसार झाले.








