जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथं प्रेमानं सुरू झालेलं नातं, कितीही कठीण का झालं तरी कायद्याच्या चौकटीतून त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. लग्नाच्या वचनांना इतकं पवित्र मानलं जातं की, जोडीदारांमध्ये समजूत न जमली, जगणं असह्य झालं, तरी घटस्फोटाची संकल्पनाच मान्य नाही. बदलत्या काळात जेव्हा बहुतेक देश वैवाहिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याला कायदेशीर मान्यता देत आहेत, तेव्हा अजूनही काही देश असे आहेत जे लग्न एक “आयुष्यभराचा करार” मानून घटस्फोटावर पूर्ण बंदी घालतात.
व्हॅटिकन सिटी

असाच पहिला देश आहे व्हॅटिकन सिटी, जगातील सर्वात छोटं, पण धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावशाली राष्ट्र. इथं कॅथोलिक धर्माच्या शिकवणुकीमुळे विवाह एक धार्मिक बंधन मानलं जातं, जे एकदा झालं की कायमचं असतं. घटस्फोटासाठी इथं कोणतीही कायदेशीर तरतूदच नाही. या भूमीवर विवाह संपवण्याचा विचारही पाप मानला जातो.
ग्वाटेमाला

ग्वाटेमालाची स्थितीही काहीशी अशीच आहे. मध्य अमेरिकेतील या देशात विवाहसंस्थेला धार्मिक आणि सांस्कृतिक पवित्रतेने पाहिलं जातं. एकदा लग्न झालं की, पती-पत्नीने कोणत्याही अडचणी असल्या तरी एकत्र राहावं, हीच अपेक्षा. त्यामुळे इथं घटस्फोट घेणं कायदेशीरदृष्ट्या मान्यच नाही.
हैती

कॅरिबियन समुद्रात वसलेला हैती देश, जिथं कॅथोलिक चर्चचा प्रभाव फार खोलवर रुजलेला आहे, तिथंही लग्नाला अत्यंत गंभीरतेने घेतलं जातं. हैतीत लग्नाला केवळ सामाजिक नव्हे, तर अध्यात्मिक बंधन मानलं जातं. त्यामुळे विवाह एकदा झाला की त्यातून माघार नाही.
फिलीपिन्स

एशियामधील एकमेव देश म्हणजे फिलीपिन्स, जिथं अजूनही घटस्फोट बेकायदेशीर आहे. इथले लोक परदेशात राहत असले तरी आपल्या देशाच्या कायद्याचा आदर करत, विवाह न तोडण्याचा नियम पाळतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये “विवाह रद्द” करण्याची प्रक्रिया आहे, पण ती फारच गुंतागुंतीची आणि कठोर आहे.
लेबनॉन

लेबनॉनमध्ये परिस्थिती वेगळी आहे, पण तितकीच कठीण. येथे घटस्फोटासाठी कोणता ही युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही, त्यामुळे धार्मिक समुदायांचे कायदे लागू होतात. मुस्लिम पुरुषांसाठी घटस्फोट शक्य आहे, पण इतर धर्मियांसाठी ही प्रक्रिया अत्यंत मर्यादित आणि जटिल आहे. विशेष परिस्थितीतच हा निर्णय घेतला जातो.
माल्टा

माल्टा देश देखील याच परंपरेचा भाग आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत इथेही घटस्फोटावर संपूर्ण बंदी होती. 2011 मध्ये जनमत चाचणीनंतर घटस्फोट कायदेशीर झाला असला तरी, आजही विवाह न संपवण्याची संस्कृती तितकीच प्रभावशाली आहे. विशेष परिस्थितीतच घटस्फोटाची परवानगी दिली जाते, तीही कठोर निकष पूर्ण केल्यानंतरच.
या देशांत लग्न केवळ दोन व्यक्तींमधील नातं न राहता, ती एक पवित्र जबाबदारी, एक आयुष्यभराची शपथ असते. त्यामुळे लग्नानंतर कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा पर्यायच उपलब्ध नसतो.








